Saturday, July 18, 2015

प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत निर्माण व्हायला हवा.


इंग्रजी माध्यम हे केवळ महाराष्ट्राचे दुर्दैव नव्हे तर हे मानवतेवरील संकट आहे. इंग्रजी ही सुनियोजित पद्धतीने विकसित झालेली भाषा नसून अडाणी, अशिक्षित समुद्री चोरांनी 
अंदाधुंद रीतीने गोळा केलेल्या शब्दांचा एक संग्रह हे इंग्रजीचे मुळ स्वरूप आहे. फ्रेंच आणि लातिन मधील प्रत्येकी २९ % टक्के शब्द, जर्मन मधील २६ टक्के शब्द आणि जर्मन आधारित भाषांमधून १० टक्के शब्द यानुसार ८४ टक्के शब्द युरोपातून आणि उरलेले सर्वच शब्द जगातील ४००० भाषांमधून उचलेगिरीच्या एकाच तत्वावर जमा केल्यामुळे इंग्रजी म्हणून जे काही वापरायचे त्याबाबत इंग्रज आणि बिगर इंग्रज अशा सर्वांची मोठी गोची झालेली आढळते.
चोरलेल्या शब्दांच्या जोडीला फक्त पाच स्वर आणि केवळ १९ व्यंजने असलेली रोमन लिपी इंग्रजीशी जोडली गेल्याने इंग्रजीचा वापर करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या मानवी जीवांच्या हालात भरच पडली आहे. रोमन लिपीच्या कुप्रभावाने उच्चार आणि लेखनात जितक्या विसंगती निर्माण होतात तितक्या जगातील इतर कोणत्याही अन्य लिपीच्या प्रभावाने होत नसाव्यात.
इंग्रजी वाक्य असल्याच्या गैरसमजाने जगातील कोणीही जी वाक्ये वाचतात, लिहितात ती वाक्ये म्हणजे विविध भाषांमधील शब्दांचे एक अनाकलनीय मिश्रण ठरते. एका वाक्यातील शब्द इंग्रजांनी ज्या विविध भाषांमधून चोरले त्या मुल भाषेच्या भाषिकांना उच्चारताच चटकन समजतात पण इतरांना ते समजण्यास अधिक वेळ, अधिक कष्ट करावे लागतात. अनेक इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्द इंग्रजांनी वेगळ्या भाषेतून चोरलेला असल्याने प्रत्येक शब्द ओलांडून जाताना एक अडथळा याप्रमाणे इंगजी वाक्य समजून घेण्यासाठी त्या वाक्यात जितके शब्द असतील तितक्या अडथळ्यांची मालिका समोर असते.
असो, भारतातील मागील काही पिढ्यांनी अनेक अनावश्यक ठिकाणी अशी मागासलेली इंग्रजी आणि तिच्यासोबत दरिद्री रोमन लिपी वापरण्याची वाईट सवय जोपासली होती. या सवयीचा उगम भारत देशातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या पुणे शहरातील लकडी पूल ते दारूवाला पूल या भागातील अनेक कारकुनांनी केला. १९८० पर्यंत भारताचा कारभार प्रामुख्याने कारकुनांच्या हातात असल्याने ही कारकुनी भाषा शिक्षणात अकारण महत्वाचे स्थान मिळवून बसली. गेल्या दीडशे वर्षात वाक्ये जुळवून कसेबसे इंग्रजी बोलणारे वाढले, इंग्रजी माध्यम शाळा वाढल्या आणि त्याचा परिहार्य परिणाम म्हणून किमान सर्वसाधारण गुणवत्ता मात्र घसरू लागली.
ही घसरलेली किमान गुणवत्ता पुन्हा वाढवण्यासाठी शिक्षणात आणि अन्य व्यवहारात इंग्रजीचा वापर शक्य तितका टाळायला हवा. शालेय शिक्षणातील इंग्रजीचे अवास्तव महत्व नष्ट झाल्याशिवाय गुणवत्ता वाढणार नाही. या सर्व प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळांच्या माध्यमात परिवर्तन केले पाहिजे. या सर्व इंग्रजी माध्यम शाळांचे रुपांतर अगोदर निम मराठी माध्यमात करायला हवे आणि नंतर त्यांचे रुपांतर पूर्णपणे मराठी माध्यम शाळेत करायला हवे. अशा मराठी माध्यम शाळांमध्ये इंग्रजी भाषा विषय सक्तीचा न ठेवता ऐच्छिक ठ्वायला हवा. दीडशे वर्षांच्या आत्मग्लानीतून भारतीयांना आणि इंग्रजांनाही ( १८६० पासून इंग्लंडमध्ये इंग्रजी या मागासलेल्या भाषेतून शिक्षण घेण्याचा प्रघात वाढला. त्यापूर्वी ते अन्य चांगल्या भाषेतून शिक्षण देत आणि घेत होते. ) बाहेर काढले पाहिजे. १८६० पासून इंग्लंडमधील शिक्षणाचा दर्जाही घसरला.
या माध्यमांतर मोहिमेसाठी प्रथम महाराष्ट्रात प्रयत्न करून हळूहळू ही मोहीम पुढे भारतभर आणि शेवटी इंग्लंडपर्यंत न्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत हवा. जे कोणी यासाठी काम करू इच्छितात त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
अनिल गोरे, मराठीकाका ९४२२००१६७१

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.