Saturday, July 18, 2015

पालकांचे अनुभव

मागील वर्षी इंग्रजी माध्यमात आणि यावर्षी मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थी आणि पालकांचे अनुभव.
१) मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी झाल्याचे जाणवते. 
२) मागील वर्षापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीशी केले जाणारे शत्रुत्व पाहता मराठीची तोंडओळख पुरेशी झाली नसली तरीहि घरातील भाषा मराठी असल्याने विविध विषय मराठीतून अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. 
३ ) मराठी लिखाणात समस्या जाणवतात पण समजावून दिल्यावर समजण्याचा वेग आश्चर्यकारक रीत्या चांगला आहे. 
४ ) इंग्रजी माध्यमात वापरत असलेल्या रोमन लिपीत स्वर, व्यंजने आणि जोडाक्षरे या सर्वच गोष्टींची भयानक टंचाई असल्याने जे उच्चार समजत नव्हते ते आता समजू लागले आहेत.
५) जोडाक्षराची तयारी करायला अधिक कष्ट घ्यावे लागतील पण ते एकदा नीट समजले की पुढील वर्षे अधिक सोयीची ठरतील असा विश्वास पालकांना वाटू लागला आहे.
६) इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम निवडल्यावर केवळ तीन आठवड्यात इंग्रजी स्पेलिंग बंवाब्ताचे मुलांचे कौशल्य वाढले आणि इंग्रजी वाक्यरचना थोडीशी सुधारली तसेच अधिक सुधारण्याची अशा वाढली आहे.
मराठीकडे अत्यंत प्रगत देवनागरी लिपी आणि वाक्यरचनेचे सुसंगत नियम असल्याने मराठीत विचार करून इंग्रजी स्पेलिंग तसेच इंग्रजीतील वाक्य तयार करण्याची पद्धत आता मुलांच्या मनात रुजू लागल्याने ही सुधारणा दिसत असावी असे मला वाटते.
इंग्रजी चांगले यावे या स्वप्नासाठी ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातकी असतील त्यांनी अजूनही विचार करून माध्यम बदलावे, इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम स्वीकारावे आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांच्या इंग्रजी भाषा शिक्षणाचा उत्तम पाया रचावा असे मी सुचवतो. दुर्दैवाने इंग्रजी माध्यमातील मुलांना यापुढेही इंग्रजी माध्यमात ठेवले तर त्यांचे इंग्रजी अधिकाधिक बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन पालकांनी सूज्ञ आणि शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आजच प्रवेश घ्यावा. माध्यम बदलून मराठी माध्यमातील प्रवेशासाठी अडचण आल्यास आपापल्या भागातील शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र शासन या पदावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,. आपल्या समस्या दूर होतील.
अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.