Saturday, July 18, 2015

माझा मित्र पांडुरंग याची सुरस आणि प्रेरणादायी कथा !


एक तप झाले त्या गोष्टीला ! माझा मित्र पांडुरंग याने मुलाला मराठी माध्यमात घालावे की इंग्रजी याचा खूप काथ्याकूट करून घरातील स्त्रीहट्टापुढे हार मानून मुलाला एका भारदस्त नावाच्या इंग्रजी माध्यम शाळेत दाखल केले. स्वत:च्या आणि पत्नीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या पाचपट रक्कम भरून त्याने मुलासाठी ज्यु. के.जी ला प्रवेश घेतला.गावातील बंद पडत आलेल्या किरण मालाच्या दुकानदाराने ते दुकान बंद करून गावातील लोकांना दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळा देण्याच्या हेतूने शाळा सुरु केली होती. पांडुरंगाचे खाते पूर्वी त्याच दुकानात असल्याने लक्ष्मीबाईच्या ओळखीने (देणगी आणि भक्कम शुल्क ) सहज प्रवेश मिळाला. पोराला शाळेत शिकवायला केरळमधील १०० % साक्षर ( स्वाक्षरी करता येणारी स्वाक्षर ) शिक्षिका नेमलेली होती. शाळेच्या पहिल्या दिवशीच त्या शिक्षिकेने पांडूच्या पोराणे केलेल्या मराठी बोलण्याच्या गुन्ह्याबद्दल दोन तोंडात ठेवून दिल्या. पोराच्या तोंडावर उठलेल्या वळाचे पांडूपत्नी वहिनींना कोण कौतुक वाटले. एक महिन्यानंतर त्या केरळी शिक्षिकेने पालकसभा घेऊन सर्व पालकांना हिंदीतून दम भरला "तुम लोकोका बच्चालोक बहुत म्हराटी बोलताय ! ये बात बहोत गलात हय इसके आग्गे अगर वैसाच चालू रह्या तो तुमारा बच्चाका स्कूल लिविंग सर्टिफिकेट तुमको दिया जायेगा |
या पालकसभेनंतर अनेक दिवस पांडूपत्नी वहिनी अनेक दिवस कौतुकाने सांगत होत्या की, "शाळेच्या बाई खूप विद्वान आहेत, कारण त्या एकही मराठी शब्द बोलत नाहीत."
पांडूचे चिरंजीव मनात आलेले काहीतरी आईला मराठीत सांगायला जायचे तेव्हा ती माउली त्याला ' आई ' हा य:कश्चित मराठी शब्द उच्चारल्याबद्दल अगोदर धपाटा घालायची आणि म्हणायची " स्पीक इन इंग्लिश हं | ' . इंग्रजी माध्यमातील बहुतेक मुलांप्रमाणे पांडूच्या मुलानेही हळूहळू आईबाबांशी बोलणे बंद केले, कारण त्याला जे सांगायचे ते लहानपणी फक्त मराठीतून सांगणे शक्य होते आणि त्याबद्दल धपाटा मिळायचा ! आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही हा ना. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा आदेश शाळा काटेकोरपणे पाळत असल्याने पांडूचा मुलगा झोकात आठवी उत्तीर्ण झाला. आठवीपर्यंत हा मुलगा राष्ट्रीय भाषा बोलू लागला होता, त्याचे त्याच्या माउलीला फार कौतुक होते. एकही मराठी शब्द नीट उच्चारता येत नसलेला हा मुलगा जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आणि पालकांच्याही आदरास पात्र ठरला होता. त्याच्या शाळेत मराठीसाठी केरळी शिक्षक, हिंदीसाठी तमिळ शिक्षक, इंग्रजीसाठी उत्तर प्रदेशातून हिंदी साहित्यात बी. ए. अनुत्तीर्ण असलेल्या सेवाभावी शिक्षिका नेमल्या होत्या. विज्ञान आणि गणितासाठी बारावीची आर्टस परीक्षा परीक्षा केवळ तीनच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला शेजारच्या गावातील तडफदार तरुण शिक्षक नेमलेला होता. महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास शिकवण्यासाठी त्याला नेपाली शिक्षक होते आणि पी.ती.साठी किरकोळ शरीरयष्टीचे एक गुजराती को ओरडीनेतर कार्यभार सांभाळत होते. या सर्वाशी जमेल तसे बोलताना पांडूच्या मुलाची भाषा राष्ट्रीय भाषा बनली होती आणि तो किंवा त्याच्या शाळेतील मुले नेमके काय बोलतात हे गावात अनेकांना समजत नसल्याने या मुलांबाबत गावात प्रचंड आदर वाढला होता.
स्वत: एकही मराठी शब्द न उच्चारणारे आणि मुलांनाही शाळेत किंवा गावात मराठी बोलू न देणारे आणि स्वत: रात्रंदिवस जमेल तसे मोडक्या तोडक्या हिंदीत संवाद साधणारे हे सर्व शिक्षक संपूर्ण गावाच्या आदरास पात्र ठरले होते. गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुले ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली पण असल्या सामान्य परीक्षेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांच्या पालकांनी महत्व देऊ नये असा आधुनिक विचार सर्व शिक्षकांनी पालकांच्या मनावर बिंबवला होता. शिष्यवृत्ती परीक्षेत पांडूच्या मुलाला ४ थीत ३०० पैकी ५७ आणि ७ वीत ३०० पैकी ३३ गुण मिळाले याबद्दल पांडूला थोडे वाईट वाटले पण पांडूपत्नी वहिनींनी त्याला समजावले की, " मुलाच्या शाळेतील सर्वांनाच असे गुण आहेत शिवाय ही मुले मुळात शिष्य्वृत्तीसारख्या सामान्य परीक्षेसाठी नाहीतच मुळी ! ही मुले सी. ए. इंजिनिअर, एमबीए होऊन अमेरिकेत जाणार असल्याने असल्या किरकोळ निकालाकडे लक्ष देऊ नये " . पांडूने हा युक्तिवाद स्वीकारला.
मागच्या महिन्यात पांडूच्या मुलाचा इ. १० वी चा निकाल लागला. ८५ % गुण मिळाले. निकालानंतर चार दिवस पांडू आणि वाहिनी मुलाला सी.ए करायचे का इंजिनिअर का थेट चाईल्ड स्पेशालीस्ट करावे याबाबत वाद घालत होते. शेजारच्या शहाण्या काकांनी त्यांना सांगितले की,
" अगोदर मुलाच्या इच्छेचा अंदाज घ्या."
पांडूच्या मुलाने स्पष्ट सांगितले " मला ११ वीला प्रवेश नको आहे. तुम्ही मला ज्या शाळेत घातले होते तिथे मला कोणताही विषय समजला नाही. पुढच्या शिक्षणात तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी पुढे काहीतरी वेगळे शिकावे असा विचार केला आहे. मला आय टी आय ला जायला आवडेल. आपल्या गावात ज्यांनी आय टी आय केले ते सर्वजण चांगली नोकरी करतात. जे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत शिकले ते प्रत्येक वर्षी वेळेवर पास होऊन इंजिनिअर झाले पण इंग्लिश मिडियमला शिकलेल्यांना चार वर्षाचे इंजिनिअरिंग पुरे करायला ५ किंवा ६ वर्षे लागली. त्यातील अनेकजण इंजिनिअरचे काम मिळत नसल्याने जमेल ते इतर काहीतरी काम करतात, त्यांच्यापेक्षा मला आय टी आय करून अधिक चांगली नोकरी मिळेल. बाबा, बारा वर्षापूर्वी तुम्ही मला इंग्रजी माध्यमात का घातले ? तुम्ही असे केले नसते तर मीही ११ वी प्रवेश घेऊन पुढे शिकू शकलो असतो. मी पुढे इंग्रजी माध्यम शाळा काढीन. आमच्या शाळेच्या चेअरमनचे जसे तीन बंगले, एक फार्म हाउस आणि सहा गाड्या आहेत तशी आपली भरभराट होईल. "
मुलाची लहान वयातील समज लक्षात घेऊन भारावलेला माझा मित्र पांडुरंग उत्साहाने नव्या इंग्रजी माध्यम शाळेसाठी जागा शोधत आहे. त्याची पुढील बारा वर्षात भरभराट होणार यात मला काही शंका वाटत नाही.
ग्रामीण असो की शहरी, प्रत्येक ठिकाणी असे अनेक पांडुरंग असतील, त्यांनी भविष्याचा विचार करावा आणि आवश्यक असेल तर वेळीच माध्यम बदलून मराठी माध्यम स्वीकारावे, मुलांच्या मोठ्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा असे मी सुचवतो. - अनिल गोरे, मराठीकाका.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.