Monday, August 3, 2015

सुलभ आणि आकलनाला सोपी मराठी भाषा,

🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔸
सुलभ आणि आकलनाला सोपी मराठी भाषा,
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹

बहुसंख्य मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा छोटे असतात.

उदा:-

👉छेद - denominator,
👉अंश - numerator,
👉फलन - fertilisation,
👉वेग - velocity,
👉कलन - derivative,
👉कर्ण - diagonal,
👉वीज - electricity,
👉प्रशासन - administration, 
👉गणित - mathematics,
👉क्लिष्ट - complicated,
👉हात - hand,
👉प्रवास - travel,
👉घर - house,
👉परीघ - circumference,
👉श्री - shree,
👉गडहिंग्लज - gadahinglaj,
👉रेणू - molecule,
👉महाराष्ट्र - maharashatra,
👉एकदिश - unidirectional.

फारच थोडे मराठी शब्द त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांपेक्षा मोठे आहेत.

उदा:

👉ओबडधोबड - rough,
👉कार्यक्रमपत्रिका - agenda
👉एकमेवाद्वितीय - unique.

९९ %   मराठी शब्दांना जितकी मराठी अक्षरे लागतात, त्यापेक्षा त्यांच्या इंग्रजी प्रतिशब्दांना दुप्पट ते पाचपट इंग्रजी अक्षरे लागतात.

ख) बहुसंख्य मराठी वाक्ये त्यांच्या इंग्रजी भाषांतरापेक्षा छोटी असतात.

१)'वस्तूवर बल लावल्याने वस्तू प्रवेगित होते’  हे ६ शब्द, १८ अक्षरी मराठी वाक्य इंग्रजीत ‘when a force is applied on a body, an acceleration is produced in that body' असे पंधरा शब्द-एकोणसाठ  अक्षरी होते. मराठीमुळे इथे  ६५%  अक्षरबचत होते.

२)'एका वर्तुळकंसात आंतरलिखित कोनाचे माप त्याने आंतरखंडित केलेल्या त्या वर्तुळाच्या कंसाच्या मापाच्या निम्मे असते' हे १४ शब्द ४४ अक्षरी प्रमेय इंग्रजीत 'the measure of an angle inscribed in an arc of a circle is half of the measure of the arc of that circle intercepted by that angle' सत्तावीस शब्द, १०४ अक्षरी होते. मराठीमुळे इथे ५३ % अक्षरबचत होते.

हे अपवाद नसून बहुतेक वाक्यात अशीच स्थिती आढळते. कोणत्याही इंग्रजी मजकुराचा  मराठी अनुवाद करून होणारी ४० % ते  ७० % बचत  स्वत: पडताळून बघा.
मराठीतून कमी वेळेत अभ्यास होऊन मुले उत्साही आणि आनंदी राहतात ...

अशा अनेक फायद्यांचा लाभ घेण्यासाठी आजच मुलांना मराठी माध्यमाच्या शाळेत शिकवण्याचा निर्णय घ्या ...

〰〰〰〰〰〰〰〰〰〰

अधिक माहितीसाठी संपर्क साधा ...

✏मराठी काका - अनिल गोरे
📞९४२२००१६७१
📧 MarathiKaka@gmail.com

     🚩मराठी शाळांचे शिलेदार समूह🚩
🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀🌻🍀

मराठी : जगासाठी उपयुक्त भाषा

हिमालयात एका जातीचे हरीण राहते. त्याच्या बेंबीत सुगंधी कस्तुरी पाझरते.ज्या सुगंधी पदार्थाची निर्मिती आपण करतो, तो माणसांना मौल्यवान वाटतो, हे त्या हरीणांना माहित नसते. यासारखे लाखो प्राणी महाराष्ट्रातही आहेत. त्यांच्याकडे कस्तुरी नाही, पण एक समृद्ध, संपन्न भाषा या प्राण्यांना येते. त्या प्राण्यांना आपल्या भाषेचे (मराठीचे) महत्व आणि व्याप्ती माहीत नाही.  भारतातील ७०% , अफगाण, पाकिस्तानातील ४०% भागात  विविध ठिकाणी एकेकाळी राजे किंवा राजांचे मुख्य कारभारी तरी मराठी होते.  छ. शिवाजी महाराजांनी भारतातील पहिले रयतेचे राज्य उभारले. शेतसारा ठराविक प्रमाणात घेणे, सैनिक आणि  कर्मचाऱ्यांना नियमित  वेतन देणे, सैन्य हंगामी स्वरुपात ठेवणे, नियमबद्ध न्यायव्यवस्था, गनिमी कावा आणि पुढे जगभर वापरल्या गेलेल्या अनेक संकल्पना महाराजांनी प्रत्यक्षात आणल्या. महाराजांना आदर्श मानणाऱ्या मराठी भाषकांकडे या संकल्पना राबविण्याची क्षमता होती म्हणून वरील व्यापक भागात कोणी ना कोणी मराठी भाषक सत्ताधारी अथवा त्यांचे मुखत्यार होते. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची सुरुवातही मराठी भाषक  तात्या टोपे, नानासाहेब पेशवे, झाशीच्या राणी लक्ष्मीबाई यांनी केली. टिळक, आगरकर यांच्याकडे नंतर या लढ्याचे नेतृत्व आले. वासुदेव बळवंत फडके, चापेकर यांच्यासारख्या मराठी भाषकांनी क्रांतीची ज्योत पेटवली. अस्पुश्यता निवारण, स्त्री-शिक्षण, जातीभेद निर्मुलन, हुंडाबंदी, विधवा विवाह या सुधारणा करण्यात मराठी लोक पुढे होते, आहेत.

स्वतंत्र भारतात सार्वजनिक वितरण, अधिकोष (बँक) सेवा, टपाल, रोजगार हमी, शिक्षण, संशोधन, उद्योग, संगणक, सामाजिक सुरक्षा, महिला सबलीकरण अशा सर्व क्षेत्रात  मराठी भाषक पुढे आहेत. धरण, सिंचन व्यवस्थापन, रस्ते, अत्याधुनिक संपर्क सेवा यातही मराठी भाषकांनी मुलभूत कार्य केले. मराठी भाषकांची महाराष्ट्र राज्य परिवहन ही जगातील सर्वात मोठी, कार्यक्षम प्रवासी सेवा आहे. व्यापक भौगोलिक भागात, मानवी उपयोगाच्या असंख्य क्षेत्रात  मराठीचा दीर्घकाळ आणि भरपूर वापर झाल्याने मराठी भाषा मानवी वापरासाठी खूप अनुकूल झाली आहे. मराठीच्या विविध बोली आणि रूपे विकसित झाली आहेत. १०० हून अधिक साहित्य प्रकार, २०० हून अधिक सादरीकरण कला मराठीच्या पंखाखाली नांदतात, त्यातील काही फक्त मराठीत असून इतर कोणत्याही भाषेत नाहीत.

भाषिक अभिव्यक्तीची इतकी स्वतंत्र साधने अन्य भाषेत नाहीत. मराठीतील वैशिष्ट्ये,  व्याकरण नियम, सोयी मानवी वापरास खूपच उपयुक्त आहेत. मराठी शब्द उच्चारानुसार लिहिता, लिहिल्यानुसार उच्चारता येतात. मूळ मराठी शब्द आणि वाक्यांत अक्षरे, जोडाक्षरे कमी असून त्यांचा उच्चार सोपा, तर उच्चाराला वेळही कमी लागतो. वेळ वाचविणे हा मराठीचा महत्वाचा गुण आहे. मराठीत शब्दाला जोडून प्रत्यय लावत असल्याने शब्दांचा क्रम मागेपुढे झाला तरी वाक्याचा अर्थ सहसा बदलत नाही. इतर असंख्य भाषांत शब्दक्रम किंचित बदलला की वाक्य चुकते. मराठीतून अतिशय सहज आणि वेगाने कोणतीही माहिती व्यक्त करता येते. देवनागरी लिपीत  सोळा स्वर व जोडाक्षर पद्धत असल्याने मराठी उच्चारांसाठी लाखो स्वतंत्र अक्षरचिन्हे आहेत. या गुणामुळे मराठी  लिखाण वेगाने करता येते.

वस्तू, भावना, संकल्पना, कार्यप्रणाली, कृति अशा बाबींसाठी त्या बाबीचा उगम, निर्मिती प्रक्रिया, उपयोग यांचा विचार करून मराठी भाषकांनी पूर्व परिचित शब्दांच्या आधारे नवे साधित मराठी शब्द निर्माण केले. थोड्या मूळ मराठी शब्दांवरून लाखो साधित मराठी शब्द निर्माण झाले. या गुणामुळे मराठी मजकूर वाचता, लिहिताना शब्दकोशांचे सहाय्य कमी लागते.   मराठी भाषकांपुढे नवीन बाब आली की ते त्यासाठी नवा साधित मराठी शब्द बनविण्याची धडपड  करतात. या गुणामुळे अवाढव्य शब्दसंग्रह सांभाळण्याची वेळ मराठी भाषकांवर येत नाही.  

या अनेकानेक गुणांमुळेच ज्ञानेश्वरांनी अमृताशी पैजा जिंकणारी असे मराठीचे वर्णन केले. अमृत  शब्दाचा एक अर्थ अ-मृत  (जीवंत) असाही आहे.  माणूसच नव्हे तर कोणत्याही जीवंत सजीवाला मराठी भाषा समजेल, आपली वाटेल असे ज्ञानेश्वरांना अभिप्रेत असावे. या भाषेचा वापर करणारे लोक शिक्षण, उद्योग  व्यापार, साहित्य अशा सर्व क्षेत्रात यशस्वी होतात.शास्त्र, अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रातील  शिक्षण  मराठीतून उपलब्ध नसल्याने मराठीकडे आपले काहीसे दुर्लक्ष झाले, पण  या सर्व क्षेत्रातील शिक्षण मराठीतून   देण्यासाठी महाराष्ट्र सरकार प्रयत्न करीत आहे. जागतिक भाषा होण्यास पात्र असलेल्या मराठीच्या  गौरवासाठी शासनाने २७ फेब्रु.  मराठी भाषा गौरव दिन म्हणून ठरवला आहे. मराठीचा गौरव सदैव करण्याचा आपण  संकल्प आपण आज करू या !  

                                            मराठीकाका, अनिल गोरे.
अध्यक्ष, समर्थ मराठी संस्था, ७०५ बुधवार पेठ, पुणे ४११००२. संपर्क : ९४२२००१६७१   marathikaka@gmail.com

संकेतस्थळे :  www.samarthmarathi.com       www.marathibhasha.com

Saturday, July 18, 2015

माझा मित्र पांडुरंग याची सुरस आणि प्रेरणादायी कथा !


एक तप झाले त्या गोष्टीला ! माझा मित्र पांडुरंग याने मुलाला मराठी माध्यमात घालावे की इंग्रजी याचा खूप काथ्याकूट करून घरातील स्त्रीहट्टापुढे हार मानून मुलाला एका भारदस्त नावाच्या इंग्रजी माध्यम शाळेत दाखल केले. स्वत:च्या आणि पत्नीच्या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी झालेल्या एकूण खर्चाच्या पाचपट रक्कम भरून त्याने मुलासाठी ज्यु. के.जी ला प्रवेश घेतला.गावातील बंद पडत आलेल्या किरण मालाच्या दुकानदाराने ते दुकान बंद करून गावातील लोकांना दर्जेदार इंग्रजी माध्यम शाळा देण्याच्या हेतूने शाळा सुरु केली होती. पांडुरंगाचे खाते पूर्वी त्याच दुकानात असल्याने लक्ष्मीबाईच्या ओळखीने (देणगी आणि भक्कम शुल्क ) सहज प्रवेश मिळाला. पोराला शाळेत शिकवायला केरळमधील १०० % साक्षर ( स्वाक्षरी करता येणारी स्वाक्षर ) शिक्षिका नेमलेली होती. शाळेच्या पहिल्या दिवशीच त्या शिक्षिकेने पांडूच्या पोराणे केलेल्या मराठी बोलण्याच्या गुन्ह्याबद्दल दोन तोंडात ठेवून दिल्या. पोराच्या तोंडावर उठलेल्या वळाचे पांडूपत्नी वहिनींना कोण कौतुक वाटले. एक महिन्यानंतर त्या केरळी शिक्षिकेने पालकसभा घेऊन सर्व पालकांना हिंदीतून दम भरला "तुम लोकोका बच्चालोक बहुत म्हराटी बोलताय ! ये बात बहोत गलात हय इसके आग्गे अगर वैसाच चालू रह्या तो तुमारा बच्चाका स्कूल लिविंग सर्टिफिकेट तुमको दिया जायेगा |
या पालकसभेनंतर अनेक दिवस पांडूपत्नी वहिनी अनेक दिवस कौतुकाने सांगत होत्या की, "शाळेच्या बाई खूप विद्वान आहेत, कारण त्या एकही मराठी शब्द बोलत नाहीत."
पांडूचे चिरंजीव मनात आलेले काहीतरी आईला मराठीत सांगायला जायचे तेव्हा ती माउली त्याला ' आई ' हा य:कश्चित मराठी शब्द उच्चारल्याबद्दल अगोदर धपाटा घालायची आणि म्हणायची " स्पीक इन इंग्लिश हं | ' . इंग्रजी माध्यमातील बहुतेक मुलांप्रमाणे पांडूच्या मुलानेही हळूहळू आईबाबांशी बोलणे बंद केले, कारण त्याला जे सांगायचे ते लहानपणी फक्त मराठीतून सांगणे शक्य होते आणि त्याबद्दल धपाटा मिळायचा ! आठवीपर्यंत अनुत्तीर्ण करायचे नाही हा ना. शिक्षणमंत्री वसंत पुरके यांचा आदेश शाळा काटेकोरपणे पाळत असल्याने पांडूचा मुलगा झोकात आठवी उत्तीर्ण झाला. आठवीपर्यंत हा मुलगा राष्ट्रीय भाषा बोलू लागला होता, त्याचे त्याच्या माउलीला फार कौतुक होते. एकही मराठी शब्द नीट उच्चारता येत नसलेला हा मुलगा जिल्हा परिषदेच्या सामान्य शाळेत शिकणाऱ्या मुलांच्या आणि पालकांच्याही आदरास पात्र ठरला होता. त्याच्या शाळेत मराठीसाठी केरळी शिक्षक, हिंदीसाठी तमिळ शिक्षक, इंग्रजीसाठी उत्तर प्रदेशातून हिंदी साहित्यात बी. ए. अनुत्तीर्ण असलेल्या सेवाभावी शिक्षिका नेमल्या होत्या. विज्ञान आणि गणितासाठी बारावीची आर्टस परीक्षा परीक्षा केवळ तीनच प्रयत्नात उत्तीर्ण झालेला शेजारच्या गावातील तडफदार तरुण शिक्षक नेमलेला होता. महाराष्ट्राचा आणि देशाचा इतिहास शिकवण्यासाठी त्याला नेपाली शिक्षक होते आणि पी.ती.साठी किरकोळ शरीरयष्टीचे एक गुजराती को ओरडीनेतर कार्यभार सांभाळत होते. या सर्वाशी जमेल तसे बोलताना पांडूच्या मुलाची भाषा राष्ट्रीय भाषा बनली होती आणि तो किंवा त्याच्या शाळेतील मुले नेमके काय बोलतात हे गावात अनेकांना समजत नसल्याने या मुलांबाबत गावात प्रचंड आदर वाढला होता.
स्वत: एकही मराठी शब्द न उच्चारणारे आणि मुलांनाही शाळेत किंवा गावात मराठी बोलू न देणारे आणि स्वत: रात्रंदिवस जमेल तसे मोडक्या तोडक्या हिंदीत संवाद साधणारे हे सर्व शिक्षक संपूर्ण गावाच्या आदरास पात्र ठरले होते. गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुले ४ थी आणि ७ वी शिष्यवृत्ती परीक्षेत चमकली पण असल्या सामान्य परीक्षेला इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील मुलांच्या पालकांनी महत्व देऊ नये असा आधुनिक विचार सर्व शिक्षकांनी पालकांच्या मनावर बिंबवला होता. शिष्यवृत्ती परीक्षेत पांडूच्या मुलाला ४ थीत ३०० पैकी ५७ आणि ७ वीत ३०० पैकी ३३ गुण मिळाले याबद्दल पांडूला थोडे वाईट वाटले पण पांडूपत्नी वहिनींनी त्याला समजावले की, " मुलाच्या शाळेतील सर्वांनाच असे गुण आहेत शिवाय ही मुले मुळात शिष्य्वृत्तीसारख्या सामान्य परीक्षेसाठी नाहीतच मुळी ! ही मुले सी. ए. इंजिनिअर, एमबीए होऊन अमेरिकेत जाणार असल्याने असल्या किरकोळ निकालाकडे लक्ष देऊ नये " . पांडूने हा युक्तिवाद स्वीकारला.
मागच्या महिन्यात पांडूच्या मुलाचा इ. १० वी चा निकाल लागला. ८५ % गुण मिळाले. निकालानंतर चार दिवस पांडू आणि वाहिनी मुलाला सी.ए करायचे का इंजिनिअर का थेट चाईल्ड स्पेशालीस्ट करावे याबाबत वाद घालत होते. शेजारच्या शहाण्या काकांनी त्यांना सांगितले की,
" अगोदर मुलाच्या इच्छेचा अंदाज घ्या."
पांडूच्या मुलाने स्पष्ट सांगितले " मला ११ वीला प्रवेश नको आहे. तुम्ही मला ज्या शाळेत घातले होते तिथे मला कोणताही विषय समजला नाही. पुढच्या शिक्षणात तुमचे पैसे वाया जाऊ नयेत म्हणून मी पुढे काहीतरी वेगळे शिकावे असा विचार केला आहे. मला आय टी आय ला जायला आवडेल. आपल्या गावात ज्यांनी आय टी आय केले ते सर्वजण चांगली नोकरी करतात. जे जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यम शाळेत शिकले ते प्रत्येक वर्षी वेळेवर पास होऊन इंजिनिअर झाले पण इंग्लिश मिडियमला शिकलेल्यांना चार वर्षाचे इंजिनिअरिंग पुरे करायला ५ किंवा ६ वर्षे लागली. त्यातील अनेकजण इंजिनिअरचे काम मिळत नसल्याने जमेल ते इतर काहीतरी काम करतात, त्यांच्यापेक्षा मला आय टी आय करून अधिक चांगली नोकरी मिळेल. बाबा, बारा वर्षापूर्वी तुम्ही मला इंग्रजी माध्यमात का घातले ? तुम्ही असे केले नसते तर मीही ११ वी प्रवेश घेऊन पुढे शिकू शकलो असतो. मी पुढे इंग्रजी माध्यम शाळा काढीन. आमच्या शाळेच्या चेअरमनचे जसे तीन बंगले, एक फार्म हाउस आणि सहा गाड्या आहेत तशी आपली भरभराट होईल. "
मुलाची लहान वयातील समज लक्षात घेऊन भारावलेला माझा मित्र पांडुरंग उत्साहाने नव्या इंग्रजी माध्यम शाळेसाठी जागा शोधत आहे. त्याची पुढील बारा वर्षात भरभराट होणार यात मला काही शंका वाटत नाही.
ग्रामीण असो की शहरी, प्रत्येक ठिकाणी असे अनेक पांडुरंग असतील, त्यांनी भविष्याचा विचार करावा आणि आवश्यक असेल तर वेळीच माध्यम बदलून मराठी माध्यम स्वीकारावे, मुलांच्या मोठ्या प्रगतीचा मार्ग प्रशस्त करावा असे मी सुचवतो. - अनिल गोरे, मराठीकाका.

इंग्रजी शाळांचा दर्जा

श्री. सुधीर काळे, श्री. जय दीक्षित, श्री. कौस्तुभ देशपांडे, श्री. आदि जोशी यांच्यासारख्या इंग्रजी माध्यम समर्थकांना सामाजिक कार्याची आणखी एक सुवर्णसंधी !
भारत देशात औपचारिक शिक्षण देणाऱ्या शाळांमध्ये इ. ८ वी ते १० वी दरम्यान गणित विषय ( यात बीजगणित आणि भूमिती हे दोन भाग असतात. ) शिकवण्यासाठी बी. एस्सी. ( गणित ) म्हणजे अगदी B.Sc. ( mathematics) नावाचा शासनमान्य विद्यापीठाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला आणि त्यासह शासनमान्य विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. ) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण झालेला/ली उमेदवार नेमावा/वी असा स्पष्ट नियम आहे.
इंग्रजी माध्यमाचे आंधळे समर्थक ज्या इंग्रजी माध्यम शाळांमध्ये पालकांनी आपली मुले शिकवलीच पाहिजेत असा सल्ला देत आहेत त्यापैकी
<<<<< Art of expensive living च्या आणि इतर ICSE नमुन्याच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा, CBSE नमुन्याच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा, महाराष्ट्र शासनच्या नियंत्रणातील राज्य मंडळाशी संलग्न इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळा >>>>>>>
अशा बहुतेक शाळांमध्ये अशा पात्रतेचे शिक्षक मुळात उपलब्धच नाहीत. वर वर्णन केलेल्या बहुतेक सर्व शाळांमध्ये फळ्याजवळ उभे राहून गणित विषय शिकवण्याचा अभिनय करणारे ८० % लोक बी. एस्सी. प्राणीशास्त्र (zoology) किंवा वनस्पतीशास्त्र ( botany ) या अभ्यासक्रमांचे उत्तीर्ण पदवीधारक आहेत किंवा काही अनुत्तीर्ण स्थितीत आहेत. अशा बी. एस्सी. प्राणीशास्त्र (zoology) किंवा वनस्पतीशास्त्र ( botany ) उत्तीर्ण अथवा अनुतीर्ण अभिनेत्यांचे/ अभिनेत्रींचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे यातील अनेकांना १० वी उत्तीर्ण होण्यासाठी गणिताची परीक्षा एकापेक्षा अधिक वेळा द्यावी लागलि होती. त्यांच्या मनात १० वी पासून गणिताची भिती ठाण मांडून बसल्याने ११ वी ते पदवी काळात त्यांनी गणित विषय निवडला नव्हता. वरील ८० % मंडळीतील अनेकांनी बी. एड. पदाविचाही पर्याय निवडलेला नाही.. या ८० % अभिनेते / अभिनेत्री वगळता उरलेल्या २० % लोकांत रसायनशास्त्र, अन्न निर्मिती, अर्थशास्त्र, भूगोल, इतिहास, भूशास्त्र, मानसशास्त्र या आणि अशा अनेक शाखांमधील पदवीधर, पदविकाधारक तसेच १२ वी उत्तीर्ण अशा पात्रतेची मंडळी आहेत. अशा सर्व विना अनुदानित शाळांमधील शिक्षकांची पात्रता तपासण्याचे कष्ट सरकारी शिक्षण विभाग घेत नाही, किंवा त्यांना तसा अधिकार नसावा. मी ही बाब २००५ पासून अनेक लेख, फलकाद्वारे उघड केली असून गेल्या दहा वर्षात अशा एकही शाळेने किंवा शिक्षकाने माझ्या माहितीपेक्षा वेगळी म्हणजे अधिक बरी स्थिती असल्याचे कळवलेले नाही.
एखाद्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत गणित शिकवण्यासाठी नेमलेला एखादा कायम शिक्षक / शिक्षिका बी. एस्सी गणित आणि बी. एड. हे दोन शासनमान्य विद्यापीठाचे अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला/ ली आहे काय याचा मी २००५ पासून शोध घेत आहे. इंग्रजी माध्यमाचे समर्थन करणाऱ्या सर्व जाणत्या विद्यार्थी, पालक, पालकांचे पालक आणि शिक्षित, अशिक्षित, साखर, निरक्षर, गरीब, श्रीमंत, देशी मुक्कामी आणि परदेशी मुक्कामी असलेल्या सर्वांना विनम्र आवाहन की, महाराष्ट्रातील आपल्या माहितीच्या कोणत्याही विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळेत वरीलप्रमाणे शासनाने निश्चित केलेल्या पात्रतेचे शिक्षक असल्याचे आढळले तर कृपया मला कळवावे. शासनाचा नियमच चुकीचा आहे आणि गणित शिकवण्यास ११ वी पासून गणित विषय न शिकलेले शिक्षकच अत्यावश्यक आहेत असे ज्यांचे मत असेल त्यांनीही आपले हे मत कळवावे, ही विनंती !
माझा संपर्क marathikaka@gmail.com असा आहे.
ज्यांनी सध्या देश परदेशातील थोरामोठ्यांच्या सल्ल्याने, मराठी माध्यमाला नाके मुरडून, अतिशय विचारपूर्वक आणि अत्यंत हौसेने आपली मुले इंग्रजी माध्यमाच्या विना अनुदानित शाळेत घातली आहेत त्यांनीही आपल्या मुलांना गणित शिकवणारे गुरुजी / गणित शिकवणाऱ्या बाई यांच्याकडे बी. एस्सी. ( गणित ) म्हणजे अगदी B.Sc. ( mathematics) नावाचा शासनमान्य विद्यापीठाचा अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण केलेला आणि त्यासह शासनमान्य विद्यापीठाचा शिक्षणशास्त्र पदवी (बी.एड. ) अभ्यासक्रम यशस्वीरीत्या उत्तीर्ण झाल्याचे अधिकृत आणि खरे प्रमाणपत्र आहे का ? याची चौकशी करावी, असे मी सुचवतो. 
जाताजाता , ८ वी ते १० वी च्या वर्गांना इंग्रजी भाषा विषय शिकवण्यासाठी बी. ए. (इंग्रजी भाषा ) अशा पात्रतेचे शिक्षक नियमानुसार आवश्यक असतात तसे आहेत का ? याचीही चोकशी करावी. माहिती मिळाल्यास मलाही कळवावी, ची विनंती !
ज्या शाळेत असे विहित किमान पात्रतेचे ( minimum required qualification ) शिक्षक गणित शिकवत असतील त्या शाळा सहजपणे माहिती देतील. ज्यांच्याकडे या किमान पात्रतेचे लोक शिकवत नाहीत ते टाळाटाळ करतील. अनेक विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमधील इंग्रजी भाषा विषय शिकवणाऱ्या शिक्षकांचे स्वत:चे शिक्षण नेमके काय आहे हे कळल्याने शिक्षित, उच्चशिक्षित पालकांची तेवढीच घटकाभर करमणूक होईल अशी मला खात्री वाटते. अशी करमणूक झाली तर स्वत:च्या अफाट खर्चाने ती करमणूक चालू ठेवायची का ती करमणूक बंद करून शहाणपणाने इंग्रजी माध्यमातील प्रवेश रद्द करून मराठी माध्यमाच्या अनुदानित शाळेचा पर्याय विनासंकोच निवडायचा याचा विचार करून ठेवावा, असे मी सुचवतो. जुन्नर तालुक्यात अनेकांनी अशी पाहणी करून इंग्रजी शाळेतील मुले काढून मराठी माध्यमात घटली त्यांचे अभिनंदन ! .
असे विहित पात्रताधारक शिक्षक विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमधील बहुतेक शाळांमध्ये नाहीत. अशा सर्व शाळांनी विहित पात्रताधारक शिक्षक नेमावेत यासाठी इंग्रजी माध्यम समर्थकांना प्रयत्न करता येतील आणि ती समाजसेवेची मोठी म्हणजे अगदी प्रचंड संशी आहे. विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळा पालकांकडून कितीही पैसा घेतला तरी शिक्षकांना अतिशय तुटपुंजे वेतन देत असल्याने आणि इतर अनेक सोयी सवलती मुळीच देत नसल्याने विहित पात्रतेचे पदवीधर अशा शाळांकडे नोकरीसाठी अर्जाच करीत नाहीत. पुरेशी पात्रता असणाऱ्यांनी व्रत म्हणून विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये कमी पगारावर शिकवावे अशी प्रेरणा देण्याचे महान कार्य देखील इंग्रजी माध्यम समर्थकांना करता येईल. समाजसेवेच्या प्रचंड संधी आपली वाट पाहत आहेत. हे कार्य तडीस नेले तर गेला बाजार नोबेल नक्कीच मिळेलच, शिवाय महाराष्ट्र इंग्रजीभूषण, इंग्रजी माध्यम उद्धारक असे प्रतिष्ठेचे जागतिक पुरस्कार देखील आपली वाटच पाहत आहेत.
वरील प्रकारच्या विना अनुदानित इंग्रजी माध्यम शाळांमध्ये मुलांना शिकवण्याचा आग्रही सल्ला देण्याआधी वरील भयंकर त्रुटी दूर झालेल्या असतील तर दिलेल्या सल्ल्याने लोकांचे भले होण्याची थोडीशी शक्यता आहे. सर्व इंग्रजी माध्यम समर्थकांणी ही सुवर्णसंधी (सुवर्णसंधीला इंग्रजीत काय म्हतात ते महित असलेल्यांनी ते समजावे ) सोडू नये असे विनम्र आवाहन !
असो, यावर्षी इ. १० वीच्या सर्व बोर्डांचा विक्रमी ९५ % निकाल लागला आणि महाराष्ट्रातील ११ वीच्या प्रवेशाची प्रक्रिया संपल्यावर ४० % जागा रिकाम्या राहिल्या आहेत. इंग्रजीकेंद्रित शालेय शिक्षणानंतर महाराष्ट्रातील किती विद्यार्थी तसलेच इंग्रजीकेंद्रित उच्चशिक्षण घेण्यास उत्सुक आहेत याचा हा पुरावाच मानायला हवा. - अनिल गोरे, मराठीकाका.

शिक्षणात स्वभाषेला प्राधान्य देऊन स्वत:ची प्रगती करून घेण्यात गुजरात देशात पहिल्या क्रमांकावर !


महाराष्ट्रातील अनेक थोर विचारवंत, नेते, शिक्षक, पाध्यापक इथे पालकांना इंग्रजी माध्यमाचा सल्ला देत असताना गुजरातने वेगळी वाट धरून मोठे यश मिळवले. 
१० विनान्तारचे विज्ञान शाखेतील उच्चशिक्षण मराठीत नाही, म्हणून १ली ते १० वी इंग्रजी माध्यमाच निवडले पाहिजे असा अशास्त्रीय, घातक सल्ला देणार्यांची संख्या महाराष्ट्रात वाढत असताना गुजरात राज्यातील नेते, कार्यकर्ते, शिक्षक आणि प्राध्यापक शांतपणे विज्ञान, तंत्रज्ञानातील उच्चशिक्षण गुजराती भाषेतून देण्यासाठी अथक परिश्रम करीत होते. या परिश्रमाला आता चांगली फळे आली आहेत.
गुजरात HSC बोर्डाच्या मार्च २०१५ मधील १२ विज्ञान शाखेच्या सर्व विषयांची लेखी परीक्षा १२५३१४ विद्यार्थ्यांनी दिली. त्यातील ८५२१९ विद्यार्थ्यांनी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित, जीवशास्त्र आणि अन्य २२ ऐच्छिक विषयांची लेखी आणि प्रात्यक्षिक परीक्षा गुजराती भाषेतून दिली. महाराष्ट्रात physics, chemistry, mathematics, biology या इंग्रजी नावांनी ओळखले जाणारे आणि फक्त इंग्रजीतूनच शिकवले जाणारे हे आणि इतर विषय गुजरातमधील शेकडो शाळा, कनिष्ठ महाविद्यालयात दैनंदिन स्वरुपात गुजरातीतून शिकवले जातात. गुजरात HSC बोर्डाने या सर्व विषयांची गुजराती भाषेतील पुस्तके देखील स्वत:हून छापली आहेत. 
११ वी, १२ वी विज्ञान ( महाराष्ट्रातील विद्वानांसाठी विशाखेचे नाव सायन्स नमूद करतो म्हणजे समजेल ) शाखेत हजारो विद्यार्थी गुजराती माध्यमातून शिकू लागल्यावर गुजरात सरकारने पुढील पावले देखील उचलली. गुजरात राज्यातील सर्व अभियांत्रिकी ( मराठी विद्वानांच्या दृष्टीने इंजिनिअरिंग) पदविका अभ्यासक्रमासाठी गुजराती माध्यम उपलब्ध आहे. फ्रेंच, जर्मन लोक जे जे अभ्यासक्रम आपल्या भाषेतून शिकवतात ते सर्व अभ्यासक्रम गुजरातीतून शिकवणे सहज शक्य आहे अशा दुर्दम्य आत्मविश्वासातून गुजरात सरकारने हे हाती घेतलेले काम तडीस नेले. ओषधनिर्माण (मराठी विद्वानांसाठी फार्मसी ) शाखेतील सर्वाधिक उद्योग गुजरातेत असल्याने गुजरात सरकारने हा अभ्यासक्रम गुजराती माध्यमातून शिकवण्याची व्यवस्था केली. सद्य देशातील सर्वात अधिक वैद्यकीय प्रतिनिधी ( मराठी विद्वानांसाठी मेडिकल रिप्रेझेंटेटिवज्) गुजराती माध्यमातून शिक्षण घेतलेले आहेत आणि इंग्रजी शरण मनोवृत्तीच्या असंख्य वैद्यकीय व्यावसायिकांना विविध औषधांची माहिती गुजरातीतून किंवा गुजरातीमिश्रित इंग्रजीतून देत आहेत. या प्रतिनिधीनी आपले बालवाडी ते पदवी / पदविका शिक्षण गुजराती माध्यमातून घेतल्याने त्यांच्या हातून काही भयानक वैद्यकीय चुका झाल्याचे गेल्या २५ वर्षात समोर आलेले नाही. मराठीतून वैद्यकीय, औषध निर्माण क्षेत्रातील शिक्षांचा विचार मांडला की अंगावर नाग चढल्यासारखे भयभीत होणारे मराठी विद्वान यातून काही बोध नक्की घेतील अशी मला खात्री आहे.
वरील अनेक विषय इंग्रजीतून शिकताना असंख्य विद्यार्थ्यांना केवळ पाठांतराचाच आधार घ्यावा लागतो पण तेच विद्यार्थी तेच विषय आणि तोच आशय गुजरातीतून शिकल्यास फारसे पाठांतर न करता विषय सखोल समजतात हा अनुभव आणि त्या दिशेने संशोधन झाल्याने गुजरातने प्रगतीचा मार्ग धरला.
महाराष्ट्रालाही हे शक्य आहे. इथे १९७७ पासून physics, chemistry, mathematics, biology या विषयांच्या प्रश्नपत्रिका महाराष्ट्र HSC बो बोर्ड मराठीतून काढते फक्त महाराष्ट्रातील अतिरेकी इंग्रजीप्रेमी शिक्षक, प्राध्यापकांनी ही माहिती चक्क ३८ वर्षे आपापल्या विद्यार्थ्यांना सांगितली नाही, इतकेच ! गावोगावच्या महान मराठी शिक्षक, प्राध्यापक, पदवीधर, सुशिक्षित, अशिक्षित, साक्षर, निरक्षर अशा सर्वांनी आता ३८ वर्षांनंतर तरी ही माहिती सर्वत्र पोचवावी, हे आवाहन !
आपल्याकडेही मराठी विद्यार्थ्यांनी physics, chemistry, mathematics, biology विषयांचा अभ्यास इंग्रजीतून करताना त्याच विषयांच्या मराठी पुस्तकातून याच विषयांची एक उजळणी केली तर केवळ पोपटपंची न करता प्रत्यक्ष विषयाचे ज्ञान उपयोगात आणणारे विज्ञान पदवीधर महाराष्ट्रात वाढतील. 
- अनिल गोरे, मराठीकाका

ज्ञानोबा माउली तुकाराम !


या जयघोषाने मराठी माध्यमाची दिंडी जोरात चालली आहे. वाट चुकून इतर माध्यमात गेलेले अनेक वारकरी आता मराठी माध्यमाची पालखी उचलायला पुढे येत आहेत. इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यमाच्या पालखीला हात देणाऱ्या सर्व शहाण्या, सूज्ञ वारकऱ्यांचे अनुकरण अधिकाधिक मराठी भाषकांनी मनापासून करावे, हे आवाहन !
क] लहान शब्द
ख ] लहान वाक्ये
ग ] पूर्वपरिचित मराठी शब्दांच्या आधारे निर्माण झालेल्या नव्या, अर्थपूर्ण ( उच्चारताच अर्थ सूचित करणारे ) मराठी शब्दांची विपुलता
घ ] उपयोग, विनियोग, उद्देश, उगम, निर्मिती प्रक्रिया, निर्मिती पद्धत, निर्मिती करणारा अशा निकषांचा विचार करून वस्तू, भावना, संकल्पना, प्रणाली, रूढी याला स्वतंत्र मराठी नाव देण्याची, विद्वानांनी सुरु केलेली परंपरा
च ] मूळ मराठी शब्दांची जोडाक्षर विरहित, सोपी रचना
छ ] वाक्यातील अनेक शब्द मागेपुढे झाले तरीही बहुतेक बदलानंतर देखील वाक्यांचा अर्थ जसाचा तसा टिकून राहणे आणि अशा बदलानंतरही वाक्य व्याकरणदृष्ट्या वैध असणे, योग्य असणे
ज ] विभक्ती प्रत्यय या सोयीमुळे पूरक शब्दांचा कमी वापर करावा लागल्याने मोठा आशय कमी शब्दांत व्यक्त होण्याची सोय.
झ ] ॐ या एका बीजाक्षराच्या वेगवेगळ्या घटकातून ५२ मुळाक्षरे आणि दहा अंकांची निर्मिती
प ] जोडाक्षर सुविधेची जोड मिळाल्याने ५२ मुळाक्षरातील दोन ते सहा अक्षराच्या जोडकामाने ४४ अब्ज स्वतंत्र अक्षरचिन्हे होण्याची शक्यता आणि क्षमता !
फ ] ५२ मुळाक्षरांची ५२ स्थाने आणि हलंत म्हणजे पाय मोडण्याचे चिन्ह इतकी ५३ चिन्हे संगणक स्मृतीत असली की संगणक ४४ अब्ज आणि त्याहून अधिक स्वतंत्र देवनागरी जोडाक्षरचिन्हे समजून घेऊ शकतो आणि उमटवून दाखवू शकतो.
ब ] जगातील सर्वाधिक विषयांवर छापील पुस्तके असणारी एकमेव भाषा !
भ ] दरवर्षी नियमितपणे लाखोंच्या उपस्थितीत ज्या भाषेतील साहित्यासाठी साहित्य संमेलन भरते अशी एकमेव भाषा म्हणजे मराठी !
मराठीची ही वरील वैशिष्ट्ये आपण जर जगातील इतर भाषकांना सांगितली आणि पटवून दिली तर मराठी ही जगातील एक मुख्य संपर्क भाषा होईल. संज्ञापन ( communication ), भाषिक संवाद, संपर्क या कामासाठी जगातील सर्वांना लागणाऱ्या वेळात किमान ३० % ते कमाल ७० % बचत करून देण्याची क्षमता मराठीत आहे. हे पटवून दिले तर जगाची भाषिक बाजारपेठ मराठी व्यक्तींना अब्जावधीचे उत्पन्न मिळवून देईल.
ज्ञानेश्वरांनी मराठी भाषा अमृताशी पैजा जिंकेल म्हणले त्यातील ' अमृत ' चा अर्थ अ - मृत म्हणजे मृत नसलेला थोडक्यात कोणताही जिवंत प्राणी असेल तर त्याला मराठी समजेल आणि अतिशय उपयुक्त ठरेल असा आहे. जगात ७३० कोटी अ - मृत मानवी जीव आहेत. त्या सर्वांना मराठीची ओळख, मराठी भाषेचे शिक्षण, प्रशिक्षण देणे हा आय टी सेवांपेक्षा अधिक रोजगार आणि अधिक उत्पन्न देणारा व्यवसाय होईल. सर्वांनी याचा गंभीरपणे विचार करावा असे मला वाटते. - प्रा. अनिल गोरे, मराठीकाका

पालकांचे अनुभव

मागील वर्षी इंग्रजी माध्यमात आणि यावर्षी मराठी माध्यमात प्रवेश घेतलेल्या काही विद्यार्थी आणि पालकांचे अनुभव.
१) मुलांवरील अभ्यासाचा ताण कमी झाल्याचे जाणवते. 
२) मागील वर्षापर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मराठीशी केले जाणारे शत्रुत्व पाहता मराठीची तोंडओळख पुरेशी झाली नसली तरीहि घरातील भाषा मराठी असल्याने विविध विषय मराठीतून अधिक चांगल्या प्रकारे समजत आहेत. 
३ ) मराठी लिखाणात समस्या जाणवतात पण समजावून दिल्यावर समजण्याचा वेग आश्चर्यकारक रीत्या चांगला आहे. 
४ ) इंग्रजी माध्यमात वापरत असलेल्या रोमन लिपीत स्वर, व्यंजने आणि जोडाक्षरे या सर्वच गोष्टींची भयानक टंचाई असल्याने जे उच्चार समजत नव्हते ते आता समजू लागले आहेत.
५) जोडाक्षराची तयारी करायला अधिक कष्ट घ्यावे लागतील पण ते एकदा नीट समजले की पुढील वर्षे अधिक सोयीची ठरतील असा विश्वास पालकांना वाटू लागला आहे.
६) इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम निवडल्यावर केवळ तीन आठवड्यात इंग्रजी स्पेलिंग बंवाब्ताचे मुलांचे कौशल्य वाढले आणि इंग्रजी वाक्यरचना थोडीशी सुधारली तसेच अधिक सुधारण्याची अशा वाढली आहे.
मराठीकडे अत्यंत प्रगत देवनागरी लिपी आणि वाक्यरचनेचे सुसंगत नियम असल्याने मराठीत विचार करून इंग्रजी स्पेलिंग तसेच इंग्रजीतील वाक्य तयार करण्याची पद्धत आता मुलांच्या मनात रुजू लागल्याने ही सुधारणा दिसत असावी असे मला वाटते.
इंग्रजी चांगले यावे या स्वप्नासाठी ज्यांनी आपली मुले इंग्रजी माध्यमात घातकी असतील त्यांनी अजूनही विचार करून माध्यम बदलावे, इंग्रजी माध्यम सोडून मराठी माध्यम स्वीकारावे आणि आपल्या अपेक्षेप्रमाणे इंग्रजी सुधारण्यासाठी मुलांच्या इंग्रजी भाषा शिक्षणाचा उत्तम पाया रचावा असे मी सुचवतो. दुर्दैवाने इंग्रजी माध्यमातील मुलांना यापुढेही इंग्रजी माध्यमात ठेवले तर त्यांचे इंग्रजी अधिकाधिक बिघडण्याचा धोका लक्षात घेऊन पालकांनी सूज्ञ आणि शहाणपणाचा निर्णय घ्यावा आणि मराठी माध्यमाच्या शाळेत आजच प्रवेश घ्यावा. माध्यम बदलून मराठी माध्यमातील प्रवेशासाठी अडचण आल्यास आपापल्या भागातील शिक्षण उपसंचालक, महाराष्ट्र शासन या पदावरील अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा,. आपल्या समस्या दूर होतील.
अनिल गोरे, मराठीकाका.