Saturday, July 18, 2015

राज्यभरातून व्यसनमुक्तीला उत्स्फूर्त प्रतिसाद !

........
............................
इंग्रजी माध्यमाचे व्यसन ज्या वेगाने पसरले त्याच वेगाने लोक त्या व्यसनाचा त्याग करू लागले आहेत.
इंग्रजी माध्यमाच्या व्यसनापोटी मुलांना इंग्रजी माध्यमात घातलेल्या अनेकांचे दोन तोटे झाले.
१ ] अनावश्यकरीत्या अफाट पैसा खर्च झाला हा अगदी छोटा आणि सहन करण्याजोगा असा पहिला तोटा झाला. या तोट्यातून सावरण्यासाठी घरबांधणी, घरदुरुस्ती पुढे ढकलणे, दागिने खरेदी बंद करणे, सण समारंभ साजरे करताना खर्च अत्यंत कमी करणे हे उपाय उपयुक्त ठरतात. त्याने भागले नाही तर इंग्रजी माध्यम शाळांची भूक भागवायला कर्ज काढणे, जमीन विकणे इ. सर्वसामान्य उपाय करून कसेतरी हि बकासुरी भूक देखील भागवता येते.
आर्थिक ओढताणीपेक्षा दुसरा एक मोठा तोटा मात्र पूर्वी लक्षात येत नव्हता तो आता पालकांच्या लक्षात येऊ लागला. इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शेतमजुरापेक्षा कमी पगारावर राबणारा / राबणारी व्यक्ती शिक्षक पदासाठी पात्र असलेले शिक्षण घेतलेली असेल याची खात्री नव्हती.
२] इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळांमध्ये शेतमजुरापेक्षा कमी पगारावर भरती केलेले कमी पात्रतेचे शिक्षक, अनेक शिक्षक मुलांना विविध विषय नीट समजावून देऊ शकले नाहीत. इंग्रजी माध्यमातील मुलांचे इंग्रजी व्याकरण मराठी माध्यमातील मुलांपेक्षा कच्चे असल्याचे अनेक पालकांना जाणवले. अनेक इंग्रजी माध्यम शाळांमधील विद्यार्थ्यांच्या मनात गणित आणि विज्ञान विषयाची भितीच निर्माण झाली. विज्ञान शाखेतील पुढील शिक्षण इंग्रजीतूनच असते असा भ्रम पसरलेला असल्याने ज्यांनी मुले आवर्जून इंग्रजी माध्यमात घातली त्या पालकांपैकी अनेकांची मुले ११ वी पासून विज्ञान शाखेत प्रवेश घ्यायला नकार देऊ लागली. इंग्रजी माध्यमाच्या अंगभूत त्रुटींमुळे त्यांच्या मुलांच्या मनात गणित, विज्ञान विषयांची भिती निर्माण झाल्याने अशा अनेक मुलांनी शाळेच्या पुढील शिक्षणात विज्ञान शाखा टाळायला सुरुवात केली. सरकारला डॉक्टर मिळेनात आणि यावर्षी महाराष्ट्रात इंजिनिअरिंग च्या एक लाख साथ हजार जागा प्रवेशासाठी उपलाभ्ध असताना त्या जागांसाठी जेमतेम पन्नास हजार अर्ज आले आहेत आणि त्यापैकी फक्त पस्तीस हजार विद्यार्थी प्रवेश घेतील असा अंदाज आहे.
इंग्रजी माध्यम आणि सेमी इंग्रजीच्या घातक व्यसनामुळे असे नुकसान होईल हे मी गेली २५ वर्षे सांगत असताना कोणी लक्ष दिले नाही पण आता परिणाम थेट घराघरात पोचला असल्याने लोक स्वत:च अनुभव घेऊन शहाणे होत आहेत याचा मला खूप आनंद होतो आहे.
जी मुले मराठी माध्यमातून शिकली त्यांना गणित, विज्ञानाची अशी भिती वाटत नाही आणि १० वी नंतरचे विज्ञान शिक्षण इंग्रजीतून घेतानाही इंग्रजी व्याकरण पक्के असल्याने १० वी पर्यंत मराठी माध्यमातून शिकलेले विद्यार्थी स्पर्धेत सरस ठरतात, हे प्रथम अनेक मराठी माध्यम शाळांमधील शिक्षकांच्या लक्षात आले. अशा अनेक शिक्षकांनी आपली मुले इंग्रजी माध्यम शाळेतून काढून मराठी माध्यमाच्या शाळेत घातली. अनेक सूज्ञ पालकांच्याही हीबाब लक्षात आल्याने गावोगावी पालक आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधून काढून मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये स्थलांतरित करीत आहेत. धुळे ते कोल्हापूर आणि मुंबई ते नागपूर अशा संपूर्ण महाराष्ट्रात इंग्रजी माध्यमातून मराठी माध्यमात मुले स्थानांतरीत करण्याची ही भावना पालकांच्या मनात आढळते. अशी इच्छा खरेतर दरवर्षी अनेक पालकांच्या मनात येत होतीच पण सुरुवात कोणी करायची असा प्रश्न होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सुमारे ३०० हून अधिक पालकांनी असा निर्णय घेतल्याने राज्याच्या इतर भागात देखील ही प्रक्रिया जोर धरू लागली.
व्यसनमुक्तीच्या या प्रवाहाची व्याप्ती आणि वेग वाढावा अशी अपेक्षा !
सर्व मराठीप्रेमींनी नवतरुण पालक आणि इंग्रजी माध्यमातील ७ वी पर्यंत इयत्तेतील मुलांच्या पालकांना या सर्व बाबी समजावून द्याव्यात. इंग्रजी भाषा नीट यावी तसेच इतर विषयांची समज सुधारावी म्हणून मराठी माध्यमाच्या तुकडीत प्रवेश घेण्यासाठी आणि सेमी इंग्रजी हा वाईट तसेच घातक पर्याय निवडू नये यासाठी पालकांना पालकांना प्रवृत्त करावे, असे मी आवाहन करतो. यावर्षी महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यात किमान १०० ते कमाल ५०० या संख्येने व्यसनमुक्तीची ( इंग्रजी माध्यमाचे व्यसन सुटल्याची ) अशी उदाहरणे आढळली आहेत. हा वेग वाढवा, यासाठी अधिकाधिक लोकांनी प्रयत्न करावेत, असे मी सुचवतो.
अनिल गोरे, मराठीकाका.

११ वी विज्ञान मराठी ची तुकडी फर्ग्युसन मध्ये

महाराष्ट्र राज्यात पुणे शहरातील फर्गसन कनिष्ठ महाविद्यालयाला जशी '' ११ वी १२ वी विज्ञान शाखेची ' मराठी माध्यम तुकडीला '' शिक्षण उपसंचालक पुणे विभाग यांनी मान्यता दिली तशी अजून सर्व कनिष्ठ महाविद्यालयांना दिलेली नाही.
असे असले तरी मान्यताप्राप्त शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयात भौतिकशास्त्र physics, रसायनशास्त्र chemistry, गणित mathematics, जीवशास्त्र biology हे विषय फक्त इंग्रजीतून शिकवत असताना घरी मराठीतून अभ्यास करण्यास कोणतीही कायदेशीर बंदी नाही. या विषयांचा अभ्यास मराठीतून केल्यास दंड किंवा शिक्षा सुचवणारा कायदा अद्याप महाराष्ट्रात संमत झालेला अनही.
मराठी, सेमी इंग्रजी आणि इंग्रजी अशा तिन्ही माध्यमातून आणि विविध सत्र बोर्डांच्या परीक्षा देऊन १० वी झालेल्या ज्यांना कोणाला मराठी लिहिता वाचता येते त्यांनी वरील विषयांचा अभ्यास इंग्रजीतून करतानाच एकदा मराठीतून देखील सर्व अभ्यास पुन्हा करावा. वरील विषय अधिक खोलवर समजण्यास विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होईल.
वरील विषय केवळ इंग्रजीतून शिकलेले विद्यार्थी आणखी उच्चशिक्षणासाठी प्रवेश घेतात तेव्हाचा अनुभव अतिशय बोलका आहे. इंजिनिअरिंग, मेडिकल आणि अन्य शास्त्रीय, तांत्रिक अभ्यासक्रमांच्या उच्चशिक्षणात प्रत्येक परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण होणार्यांची संख्या केवळ २० % ते ३० % आढळते, त्यातही पहिल्या वर्गात उत्तीर्ण होणारे २ ते ३ % च आढळतात.
ही निराशाजनक परिस्थिती बदलायची असेल तर किमान १२ वी पर्यंत वरील विषयांचा अभ्यास इंग्रजीसह किंवा इंग्रजीशिवाय मराठीतून अवश्य करावा, असे मी सुचवतो. लहानपणी इंग्रजी माध्यमात शिक्षणाला सुरुवात केल्याने काहींना मराठी वाचता येत नसेल तर मराठी शिकावी आणि आपली प्रगती साधायला वरील विषयांची मराठी पुस्तके वाचावीत अशी मी शिफारस करतो.
मराठी शिकणे अगदीच शक्य नसेल तर किमान फ्रेंच आणि जर्मन या दोन भाषा शिकाव्यात आणि त्या भाषेतील वरील विषयांची पुस्तके वाचावीत. वरील विषय मराठीतून जितके चांगले कळतात त्याचप्रमाणे फ्रेंच आणि जर्मन मधून देखील बऱ्यापैकी समजतात.
जो इंग्रजीवरी विसंबला, त्याचा कार्यभाग बुडाला.
असे कोणीतरी म्हणले आहे ते लक्षात ठेवावे, हे आवाहन !
- अनिल गोरे, मराठीकाका.

७ जून ते १२ जून समुपदेशन आठवडा !


मागासलेली इंग्रजी भाषा आणि दरिद्री रोमन लिपी या दोन निकृष्ट साधनांच्या आधारे आपल्या मुलांना संपूर्ण शालेय शिक्षण देण्याचा निर्णय घेतल्याने आपली मुले स्पर्धेत मागे पडत असल्याची जाणीव होत असलेल्या पालकांसाठी ७ जून ते १२ जून या कालावधीत इंग्रजी माध्यमाच्या सापळ्यातून सुटका कशी करून घ्यावी याबाबत रोज सायंकाळी ५ ते ७ या वेळात आईबाबांचे पुढील दोन मुद्द्यांवर समुपदेशन केले जाईल. इच्छुक पालकांनी संपर्क साधावा.
मुद्दा १ ] इंग्रजी माध्यम सोडून देऊन मराठी माध्यमाच्या शाळेत मुलांना घालणे
मुद्दा २ ] सामाजिक दबावामुळे इंग्रजी माध्यम सोडायचे नसेल त्यांनी इंग्रजी माध्यमामुळे होणारे भयानक नुकसान टाळण्यासाठी मराठी माध्यमाची पुस्तके, मराठी माध्यमात शिकवणाऱ्या म्हणजे स्वत: ' पुरेसे शिकलेल्या ' आणि नियमित प्रशिक्षण मिळणाऱ्या पात्र तसेच अनुभवी शिक्षकांचे मार्गदर्शन आपल्या मुलांसाठी मिळवणे.
इच्छुक पालकांनी समुपदेशनासाठी तातडीने संपर्क साधून भेटवेळ ठरवावी, हे आवाहन
अनिल गोरे, मराठीकाका

नव्या शैक्षणिक वर्षाची अत्यंत आनंददायी सुरुवात !


वडगाव मावळ, जि. पुणे, महाराष्ट्र, भारत या गावातील
"माधव स्मृती" व्यक्ती विकास संस्था
या संस्थेत दि. २४ / ०५/ २०१५ या दिवशी माझे भाषण झाले.
आकलन आणि अभिव्यक्तीसाठी इंग्रजीच्या तुलनेत मराठीत अधिक प्रमाणात असलेल्या सोयी , कोणताही आशय मराठीतून वाचताना, लिहिताना, समजावून घेताना होणारी बालकांच्या वेळेची ६० % ते ७० % बचत, मराठी माध्यमाच्या शाळांतील मुलांचे आणि मुलींचे इंग्रजी भाषाविषयक कौशल्य ( स्पेलिंग अचूकता, व्याकरण, वाक्यनिर्मिती इ. ) इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेने अधिक चांगले असल्याचे आढळलेले गेल्या दीडशे वर्षातील सत्य, गेल्या साठ वर्षात सर्व स्पर्धा परीक्षांत मराठी माध्यमाच्या मुलांना सातत्याने मिळालेले अतिशय लक्षवेधी आणि उत्तुंग यश या सर्व बाबी मी त्या भाषणात उलगडून सांगितल्या.
त्या भाषणाला हजार असणार्या सौ. हर्षदा दुबे आणि त्यांचे पती यांनी गेले काही दिवस याबाबतीत घरी विचारविनिमय केला आणि पूर्ण विचारांती,
एका इंग्रजी माध्यम शाळेत शिकणाऱ्या आपल्या ज्युनिअर के. जी. उत्तीर्ण मुलाचे शालेय शिक्षणासाठीचे भाषा माध्यम बदलून त्याला तळेगाव दाभाडे येथील सरस्वती मंदिर या मराठी माध्यमाच्या शाळेत दाखल करण्याचा निर्णय घेतला असून ते आज त्या शाळेत प्रवेशासाठी आपला अर्ज दाखल करणार आहेत.
हा निर्णय घेताना या दाम्पत्याने मराठी शाळा स्वस्त आणि इंग्रजी शाळा महाग असा विचार केला नसून मराठी शाळेतून मुलाचे इंग्रजीविषयक कोशल्य अधिक चांगले विकसित होऊ शकेल शिवाय इतर सर्व विषय मराठीतून शिकल्याने मुलाला ते विषय अधिक चांगले शिकता येतील या लाखोंच्या अनुभवसिद्ध आणि रास्त अपेक्षेने हा माध्यम बदलाचा निर्णय घेतला आहे.
या निर्णयाबद्दल दुबे दाम्पत्याचे अभिनंदन आणि चि. दुबे याला मोठ्या यशासाठी शुभेच्छा !
माझी भाषणे अधिकाधिक ठिकाणी आयोजित करावीत असे आवाहन !
- अनिल गोरे, मराठीकाका.

प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत निर्माण व्हायला हवा.


इंग्रजी माध्यम हे केवळ महाराष्ट्राचे दुर्दैव नव्हे तर हे मानवतेवरील संकट आहे. इंग्रजी ही सुनियोजित पद्धतीने विकसित झालेली भाषा नसून अडाणी, अशिक्षित समुद्री चोरांनी 
अंदाधुंद रीतीने गोळा केलेल्या शब्दांचा एक संग्रह हे इंग्रजीचे मुळ स्वरूप आहे. फ्रेंच आणि लातिन मधील प्रत्येकी २९ % टक्के शब्द, जर्मन मधील २६ टक्के शब्द आणि जर्मन आधारित भाषांमधून १० टक्के शब्द यानुसार ८४ टक्के शब्द युरोपातून आणि उरलेले सर्वच शब्द जगातील ४००० भाषांमधून उचलेगिरीच्या एकाच तत्वावर जमा केल्यामुळे इंग्रजी म्हणून जे काही वापरायचे त्याबाबत इंग्रज आणि बिगर इंग्रज अशा सर्वांची मोठी गोची झालेली आढळते.
चोरलेल्या शब्दांच्या जोडीला फक्त पाच स्वर आणि केवळ १९ व्यंजने असलेली रोमन लिपी इंग्रजीशी जोडली गेल्याने इंग्रजीचा वापर करणाऱ्या आणि करू पाहणाऱ्या मानवी जीवांच्या हालात भरच पडली आहे. रोमन लिपीच्या कुप्रभावाने उच्चार आणि लेखनात जितक्या विसंगती निर्माण होतात तितक्या जगातील इतर कोणत्याही अन्य लिपीच्या प्रभावाने होत नसाव्यात.
इंग्रजी वाक्य असल्याच्या गैरसमजाने जगातील कोणीही जी वाक्ये वाचतात, लिहितात ती वाक्ये म्हणजे विविध भाषांमधील शब्दांचे एक अनाकलनीय मिश्रण ठरते. एका वाक्यातील शब्द इंग्रजांनी ज्या विविध भाषांमधून चोरले त्या मुल भाषेच्या भाषिकांना उच्चारताच चटकन समजतात पण इतरांना ते समजण्यास अधिक वेळ, अधिक कष्ट करावे लागतात. अनेक इंग्रजी वाक्यातील प्रत्येक शब्द इंग्रजांनी वेगळ्या भाषेतून चोरलेला असल्याने प्रत्येक शब्द ओलांडून जाताना एक अडथळा याप्रमाणे इंगजी वाक्य समजून घेण्यासाठी त्या वाक्यात जितके शब्द असतील तितक्या अडथळ्यांची मालिका समोर असते.
असो, भारतातील मागील काही पिढ्यांनी अनेक अनावश्यक ठिकाणी अशी मागासलेली इंग्रजी आणि तिच्यासोबत दरिद्री रोमन लिपी वापरण्याची वाईट सवय जोपासली होती. या सवयीचा उगम भारत देशातील महाराष्ट्र राज्यात असलेल्या पुणे शहरातील लकडी पूल ते दारूवाला पूल या भागातील अनेक कारकुनांनी केला. १९८० पर्यंत भारताचा कारभार प्रामुख्याने कारकुनांच्या हातात असल्याने ही कारकुनी भाषा शिक्षणात अकारण महत्वाचे स्थान मिळवून बसली. गेल्या दीडशे वर्षात वाक्ये जुळवून कसेबसे इंग्रजी बोलणारे वाढले, इंग्रजी माध्यम शाळा वाढल्या आणि त्याचा परिहार्य परिणाम म्हणून किमान सर्वसाधारण गुणवत्ता मात्र घसरू लागली.
ही घसरलेली किमान गुणवत्ता पुन्हा वाढवण्यासाठी शिक्षणात आणि अन्य व्यवहारात इंग्रजीचा वापर शक्य तितका टाळायला हवा. शालेय शिक्षणातील इंग्रजीचे अवास्तव महत्व नष्ट झाल्याशिवाय गुणवत्ता वाढणार नाही. या सर्व प्रक्रियेची पहिली पायरी म्हणून महाराष्ट्रातील इंग्रजी माध्यम शाळांच्या माध्यमात परिवर्तन केले पाहिजे. या सर्व इंग्रजी माध्यम शाळांचे रुपांतर अगोदर निम मराठी माध्यमात करायला हवे आणि नंतर त्यांचे रुपांतर पूर्णपणे मराठी माध्यम शाळेत करायला हवे. अशा मराठी माध्यम शाळांमध्ये इंग्रजी भाषा विषय सक्तीचा न ठेवता ऐच्छिक ठ्वायला हवा. दीडशे वर्षांच्या आत्मग्लानीतून भारतीयांना आणि इंग्रजांनाही ( १८६० पासून इंग्लंडमध्ये इंग्रजी या मागासलेल्या भाषेतून शिक्षण घेण्याचा प्रघात वाढला. त्यापूर्वी ते अन्य चांगल्या भाषेतून शिक्षण देत आणि घेत होते. ) बाहेर काढले पाहिजे. १८६० पासून इंग्लंडमधील शिक्षणाचा दर्जाही घसरला.
या माध्यमांतर मोहिमेसाठी प्रथम महाराष्ट्रात प्रयत्न करून हळूहळू ही मोहीम पुढे भारतभर आणि शेवटी इंग्लंडपर्यंत न्यायची आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात एक माध्यमांतर दूत हवा. जे कोणी यासाठी काम करू इच्छितात त्यांनी कृपया माझ्याशी संपर्क साधावा.
अनिल गोरे, मराठीकाका ९४२२००१६७१

आनंदाची बातमी !


येत्या जून महिन्यापासून पुणे महानगरपालिकेने सुरु केलेल्या सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा बंद करून त्या शाळांचे रुपांतर मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये करणार !
काही काळ या शाळा इंग्रजी माध्यमाच्या होत्या त्या काळात त्या शाळांमधील ज्या विद्यार्थ्यांचे इंग्रजी भाषा आणि इंग्रजी व्याकरणाचे अतोनात नुकसान झाले अशा विद्यार्थ्यांचे इंग्रजी सुधारण्यासाठी त्यांना प्रथम मराठीची उत्तम ओळख करून द्यावी. ज्यांचे मराठी चांगले आहे त्यांचे इंग्रजी लवकर सुधारते असा अनुभव लाखो जणांना आहे. इंग्रजीचा हव्यास पुरा करण्यासाठी पायाभूत भाषिक कौशल्य म्हणून मराठीची उत्तम तयारी करवून घेण्यासाठी आता पुणे महानगरपालिका मराठी भाषा संवर्धन समितीत मी प्रस्ताव ठेवणार आहे.
जगातील कोणत्याही महानगरपालिकेत भाषा संवर्धनासाठी स्वतंत्र समिती, २०१५ - १६ साठी ७७ लाखाची अंदाजपत्रकी तरतूद, स्वतंत्र कार्यालय, स्वतंत्र कर्मचारी अशी व्यवस्था नाही. या मराठी भाषा संवर्धन समिती पुणे महानगरपालिका, समितीचा सदस्य या नात्याने मी इंग्रजी सुधारण्यासाठी मराठीचे उत्तम प्रशिक्षण हा कार्यक्रम सुचवणार असून हा कार्यक्रम अधिकाधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी फेसबुक्का लावून मन:पूर्वक टंकन करणाऱ्या मराठीप्रेमींनी आपल्या सूचना प्रतिक्रियेच्या रुपात कळवाव्यात असे आवाहन !
इंग्रजी माध्यम हा हलक्या दर्जाचा पर्याय स्वीकारल्याने इंग्रजीची जि वाईट अवस्था झाली आहे त्या अवस्थेतून मार्ग काढायला जगातील पहिली नागरी भाषा असलेली मराठी अत्यंत उपयुक्त ठरेल या विश्वासाने हा कार्यक्रम सुचवला आहे. महाराष्ट्रात इतरत्र देखील हा प्रयोग करून पहावा असे मी सुचवतो.
परप्रांतात असलेल्या पालकांनीही आमच्या महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची मराठी पाठ्यपुस्तके संगणकावर उतरवून घेण्यास विनामुल्य उपलब्ध असल्याने त्याचा लाभ घ्यावा. सर्व विषय अगोदर मराठीतून शिकून नंतर हवेतर शाळेच्या माध्यमानुसार इतर भाषेतून देखील उजळणी करावी हा अभ्यासाचा एक प्रभावी मार्ग आहे. जगातील कोणालाही हा उत्तम मार्ग उपलब्ध असून प्रयोग करून पहावा आणि अनुभव कळवावा हे आवाहन ! अनिल गोरे, मराठीकाका.

हिंदू धर्मीय अधिक श्रीमंत

वॉशिंग्टन - जगातील प्रख्यात प्यू रिसर्च संस्थेने अमेरिकेतील अन्य धर्मियांपेक्षा हिंदु आणि ज्यू धर्मीय अधिक श्रीमंत आणि शिक्षित आहेत, असा निष्कर्ष काढला.
१. अमेरिकेतील हिंदु धर्मियांपैकी ७७ टक्के, तर ज्यू धर्मियांपैकी ५९ टक्के नागरिक पदवीधर आहेत. 
अमेरिकेच्या उर्वरित लोकसंख्येपैकी केवळ २७ टक्केच पदवीधर आहेत. 
२. उत्पन्नाच्या बाबतीतही हिंदु आणि ज्यू धर्मियांतील अनुक्रमे ३६ आणि ४४ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाखहून अधिक आहे. 
या उलट उर्वरित लोकसंख्येपैकी केवळ १९ टक्के लोकांचे वार्षिक उत्पन्न ६४ लाखहून अधिक आहे.
हिंदूंच्या मनातील विचार एखाद्या प्रगत, समृद्ध, संपन्न भारतीय भाषेच्या ( बहुतांश लोकांच्या बाबतीत मराठी ) सबळ माध्यमातून होतो. त्यामुळे विषय चटकन समजतो, निर्णय वेगाने घेता येतात.
मागासलेल्या इंग्रजीवर आणि दरिद्री रोमन लिपीवर शंभर टक्के आपले जीवन अवलंबून ठेवणारे लोक अगदी अमेरिकेत देखील प्रगत भाषेचा परिचय असलेल्यांच्या तुलनेत मागे पडतात. जगातील पहिली नागरी भाषा असलेल्या मराठीचा परिचय अमेरिकेला करून दिला अमेरिकेत मराठीला महत्व मिळेल आणि नंतर भारतातील, महाराष्ट्रातील आणि विशेषत: पुण्यातील अनेक पदवीधर अशिक्षित लोक आपले पूर्वीचे प्रतिपादन विसरून मराठी किती महत्वाची आहे याबाबत खडे बोल सुनावू लागतील अशी मला खात्री वाटते. - अनिल गोरे, मराठीकाका.